BAMS या कोर्सबद्दल माझे काही फारसे चांगले मत नाही. जो कुणी मला याबद्दल विचारेल, त्याला मी हेच सांगतो. हुशार मुलंमुली असतील तर त्यांना BA करायचा सल्ला देतो, पण BAMS नाही.
आयुर्वेदाचं एकुणच शिक्षण जुनाट-वळणी, पाठीमागे डोळे असलेलं आहे. आयुर्वेदाच्या अभ्यासकांना चिकित्सा रुचत नाही. श्रद्धा हवी आहे. “रजोतमाच्या पार गेलेले ते महात्मे असत्य बोलतीलच कशाला?” असा प्रतिवाद आहे.
इथे एक समजून घ्यावं. चरक-सुश्रुतांबद्दल मला नितांत आदर आहे, पण तो यासाठी कि त्यांनी चिकित्सा केली, प्रयोग केलेत. BAMS च्या साडेपाच वर्षात आम्ही चिकित्सा करत नाही, तर अधिकाधिक श्रद्धेनं अंध होण्यावर आमचा जोर असतो. पुढेही क्लिनिकल स्टडीज़ मध्ये randomised/blind ट्रायल्स करत असूच तर त्याची माहिती फारशी कुठे मिळत नाही. आम्ही पारदर्शी नाही. समजदार रुग्णांनी tricky प्रश्न विचारले तर आम्हाला उत्तरे देता येत नाहीत. उदा. “या औषधात आर्सेनिक/मर्क्यूरी आहे, हे सेफ आहे माझ्यासाठी?” आपण शोधन इ. मम्बोजम्बो सांगून समजवतो. किंवा उदा. “मी हाय ब्लड प्रेशर साठी आयुर्वेदिक औषधी सुरू केली १५ दिवसांपासून, आता माझी ॲलोपॕथीक औषधं बंद करू?” आपल्या ट्रीटमेंटवर आपला विश्वास नाही, कारण कधीकधी ती काम करही नाहीत हे आपण जाणतो.
मी आयुर्वेदातून सुटलो. मी अजूनही स्वतःवर आयुर्वेद वापरतो, पण मुख्यतः जीवनशैलीच्या संदर्भात. चुकून आजारी पडल्यास मी चुकूनही आयुर्वेदीक डॉक्टरकडे जात नाही.
(आयुर्वेदाच्या माझ्या काही शिक्षकांबद्दल मला ब-यापैकी आदर आहे, पण त्याला वेगळी वैयक्तिक कारणं आहेत).