खूप खूप वर्षांआधी माझ्या डोळ्यांवर जेव्हा अज्ञानाची झापडं होती तेव्हा काँग्रेस म्हटलं की वाटायचं हा काय पक्ष आहे? याला काही विचरधारा वगैरे आहे की नाही? तेव्हा कळंत नव्हतं.
आत कळतं, काँग्रेस म्हणजे आपणंच.. सगळ्यांनी गुण्यागोविंद्यानं रहावं, आपापलं काम करत रहावं, एकमेकांच्या सुखदुःखात धावून जावं, आपल्या घरची भाकर त्याला द्यावी, त्याच्या घरची भाजी आपण खावी, पडत्याला हात द्यावा.. याच तर पायावर काँग्रेस उभी राहिली.
काँग्रेसनं कधी पोकळ अन् भपकेबाज आशावादानं लोकांना दिपवून टाकण्याचा यास नाही केला. काँग्रेस चालत राहिली, चुकतमाकत, घोडचुका करत, सावरत पुढे चालत राहिली.
गेल्या सत्तर वर्षात आपण करोडो लोकांना गरिबीतून वर उचललं. यात लोकांचंच श्रेय खरं. पण काँग्रेसनं निदान त्यांना पोषक वातावरण दिलं. आज आपली पोटं भरलेली आहेत तर दोन रूपयात गहू तांदूळ देणं आपल्याला आळशी वृत्ती वाढवणं वाटतं. पण साधं अर्थशास्त्र पाहिलं तर गरिबांचा मूळ खाद्यपदार्थांवरचा खर्च कमी झाला; थोडे पैसे शिलकित पडू लागलेत. तेच इतर घरगुती विकासात कामी लागू लागली. मुलं शिकायला लागली. समाजा-समाजात तेढ हा स्थायीभाव न बनू दिल्यामुळे एकंदरीतच समाज इतर विकासाच्या कामात डोकं लावू शकला. समाजाचा आर्थिक विकास झाला, समाजात विज्ञान हळूहळू का होईना रुजत गेलं. आज अवघ्या जगाची बाजारपेठ आपल्याला खुली आहे, आज आपल्या करोडो लोकांच्या हातात मोबाईल फोन आहे, आपल्या मुलांची बोटं संगणकांशी खेळत आहेत, या सगळ्या घडामोडींच्या पाठीशी पडद्यामागे काँग्रेस आहे.
काँग्रेसनं कधी या गोष्टींचा गाजावाजा नाही केला, न कधी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस आपल्या पद्धतीनं भारतीय समाजाला, देशाला समोर नेत राहिली.
असं नाही की काँग्रेसमध्ये काही उणीवा नाहीतच. पण मोठ्या लोकांच्या अंगी असते तशी चुका स्विकारण्याची विनम्रताही काँग्रेमध्ये आहे. काँग्रेस चुकते, शिकते. काँग्रेस परिपुर्णपणाचा आव आणत नाही. काँग्रेस सतत विकसनशील आहे. ती विकसित होत राहील. काँग्रेस उठेल. आज नाही तर उद्या, काँग्रेस जिंकेल.