कधीकधी वाटतं एखादं नोटबुक असावं जवळ – आधी असायचं तसं – सुंदर नवनीत किंवा क्लासमेटचं. दर्जेदार पानं, ओळींदरम्यान चांगली ऐसपैस जागा. मग मी एक नवीन पेन विकत घेईन, सुंदर चालणारा – आधी असायचा तसा..
आधी किती छान असायचं सगळं! वही, पेन, अक्षर, लिहिणं.. सतत काहीतरी डोक्यात घोळत राहायचं. आपण तसंच ते कागदावर उतरवत राहायचो. स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस म्हणतात तसं.. अजुनही कधीकधी पेन उचलायची इच्छा होते.. पण मन धजावत नाही..
संध्याकाळ झाली की घरी जायचं. (माझं सध्याचं घर म्हणजे दोन बेडरूम, एक हॉल, एक किचन, डायनिंग हॉल, अजून काही काही, आणि त्यात राहतो मी एकटा)! अंथरूण समोरच्या घरात पडलेलं असतं.. (आधी असायचं तसं.. पण तेव्हा कधीकधी ते आवरूनही ठेवायची इच्छाही व्हायची..). मी लॅपटॉप काढतो.. एखादी मुव्ही लावतो.. डोक्याला विचार करायला वेळ मिळू नये..
आजकाल ही स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस फार भितीदायक वाटते. स्वतःला एकटा वेळ देणं बंद केलंय केव्हाचंच. उठायला सकाळी ९:२० चा अलार्म लावलाय (आधी ५ ला उठायचो, अलार्मची गरजही नव्हती वाटंत कधी.. अन् मग फिरायला रस्त्यावर..). ९:२० ला उठल्यावर तयार व्हायचीच घाई.. डोक्यात काही विचार यायला चान्स द्यायचा नाही. बुधवार, गुरूवारपासूनच शनीवारची भिती वाटायला सुरुवात होते..
काल उगीच काहीतरी डाऊनलोड करत होतो.. नस्सिम निकोलस तालेबचं कुठलंसं पुस्तक चाळता-चाळता आलं – “To become a philosopher, start by walking very slowly.” त्या दिवसांमध्ये हेच एक होतं – चालणं.. उगीच रस्त्यांवर चालणं, जायचं कुठेच नाही.. चरैवेति.. चरैवेति.. स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस.. वाहत्या पाण्याचं वाट काढत जाणं.. घरी यायचं, नोटबूक अंथरुणावरंच असायचं, उशीखाली.. लिहिणं सुरू.. तेव्हा किती निर्भिक होतो आपण! अगदी कशाचीच भिती नव्हती वाटंत – कुण्या माणसाची नाही, समाजाचीही नाही.. या मधल्या वर्षांनी आपलं पुरतं मांजर करून टाकलं..
त्या दिवशीही आपण गेलो असतो बाहेर तर काय बिघडलं असतं? भांडण झालं असतं कदाचित.. तमाशा झाला असता.. याची खरंच भिती वाटते आता.. आताही फोन वाजला तर न उचलायचीही भिती वाटते.. का? … का? एक उदास सुस्कारा सोडायचा फक्त…
असो.. माझ्या लिहिण्यात व्यत्यय येतंच राहतात.. या व्यत्ययादरम्यान उगीचंच फैज़ची एक ओळ आठवली.. हम जो तारीक राहों में मारे गये.. (ह्या असल्या random ओळी मला कुठल्याही random वेळी का आठवतात कुणास ठाऊक? कशात काही नसतांना आज ही ओळ का आठवावी? पण नंतर पाहावं ही ओळ या मनस्थितीला ब-यापैकी पूरकंच वाटते.. काहीही आपंल असंच..)
नोटबूकचं काय? नको… नाहीच जमणार ते आपल्याला.. आता फारफार तर एखादं पान लिहितो आपण.. हे असं कुठवर चालणार हेही आपल्याला माहित नाही.. तसं पाहिलं तर आपल्याला काहीच माहित नाही.. आपण आला दिवस ढकलतोय.. फार विचार न करता.. कारण विचार करायची भिती वाटते आपल्याला आता.. मोकळं सोडलं तरी उडत नाही आपण .. आपण मेलोय आधीच, अन् एक मरण जगतोय.. आता मेलेल्या माणसाला कशाला डायरी अन् कशाला काय…?